पुणे : भारतीय वाङ्मय ज्या ग्रंथाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील तो ग्रंथ म्हणजे महाभारत. फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक साहित्यकृतींमध्ये महाभारताचे स्वतःचे असे स्थान आहे. भारतीय शिकवण आणि तत्त्वज्ञान यांचा कथारूप मिलाफ म्हणजे महाभारत. परंतु, आजही कित्येकांना महाभारताची संपूर्ण ओळख नाही. ती करून देण्यासाठी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने ‘महाभारत व्याख्यानमाला’ हा उपक्रम सुरू केला आहे. महाभारताच्या अभ्यासक लीला मेहेंदळे पुणेकरांना समग्र महाभारताचे दर्शन घडवणार आहेत. दर बुधवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत भांडारकर संस्थेत ही व्याख्याने होतील.
लीला मेहेंदळे भगवद्गीता आणि महाभारताच्या अभ्यासक म्हणून आहेत. त्यांनी वडील डॉ. बलराम अग्निहोत्री यांच्याकडे संस्कृत व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला आहे.‘महाभारतातील भारतीय तत्त्वज्ञान’ या विषयावर भांडारकर संस्थेमध्ये त्यांचे अध्ययन सुरू आहे. व्याख्यानमालेत कथाकथनाच्या माध्यमातून मेहेंदळे महाभारतातील बारकावे सांगणार आहेत. सध्याच्या तरुणांना देशाच्या एका महान ग्रंथाचे पैलू कळावेत या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय कुटुंबांतील मुलांचे बालपण क्वचितच महाभारताशिवाय जाते. अनेक पिढ्या मौखिक परंपरेने चालत आले असल्याने महाभारत त्याच्या मूळ संहितेपासून बरेच दूर आले आहे. काळानुरूप ज्येष्ठ नागरिक, प्रौढ नागरिक, तरुण, किशोर आणि शाळकरी मुले असे वर्गीकरण केले, तर सध्याच्या या चारही पिढ्यांमध्ये महाभारताबद्दलची अर्धवट माहिती आहे. अशा लोकांना महाभारताची खरी ओळख करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे.